“डहाडीमध्ये नळातून दूषित पाणी; रिलायन्स बायोगॅस प्रकल्पावर आरोप, प्रशासन सुस्त?”
📍 मौदा (प्रतिनिधी):
मौदा तालुक्यातील नानादेवी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या डहाडी गावात नळांना दूषित पाणी येत असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या दूषित पाण्यामुळे गावात रोगराई पसरण्याची शक्यता व्यक्त होत असून काही नागरिकांना आजाराची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, गावालगत असलेल्या रिलायन्स बायोगॅस एनर्जी या प्रकल्पातून प्रक्रिया केलेले दूषित पाणी कन्हान नदीपात्रात सोडले जात असल्यामुळे👉https://youtu.be/nfdws2LBxSI?si=f9qp4hYstCWSDwjp जलजीवन मिशन अंतर्गत पुरवठा होणारे पाणी दूषित होत आहे. https://youtu.be/1VctbwQB4JA?si=9faBkuvLBL8z3BY1👈या संदर्भातील व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यामध्ये नळातून येणाऱ्या दूषित पाण्याचे दृश्य स्पष्ट दिसत आहे.
या गंभीर प्रकरणाकडे कंपनी प्रशासन तसेच पर्यावरण नियामक मंडळाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. त्यामुळे संबंधित कंपनी मनमानी कारभार करत असल्याचेही बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक ग्रामपंचायत व प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी जोर धरत आहे.
दरम्यान, कन्हान नदीपात्रात मासेमारी करणाऱ्या मत्स्य व्यवसायिकांनाही याचा फटका बसत असून त्वचारोगासह इतर आजारांचे प्रमाण वाढल्याचे सांगितले जात आहे. दूषित पाण्यामुळे अनेक मासेमार नदीपात्रात जाणे टाळत असल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्नही निर्माण झाला आहे.
तसेच, लहान मुलांमध्ये साथीचे आजार, श्वसनाचे विकार व यकृताशी संबंधित आजार होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी ग्रामपंचायत तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींना सोशल मीडियाच्या माध्यमातून तातडीने लक्ष घालण्याचे आवाहन केले आहे.
एकूणच, आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या या गंभीर प्रकरणात प्रशासनाने तात्काळ हस्तक्षेप करून योग्य ती कारवाई करावी, अशी ठाम मागणी डहाडी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.




